85305 84532 | 98210 87115
info@saveoursahyadri.net

दुष्टचक्र

शेतकऱ्याची दुरावस्था
शेतकऱ्याची अवस्था

सह्याद्रीतील शेतकऱ्याचे वर्तमान अतिशय भीषण आहे. तो अनेक अडचणींच्या चक्रव्यूहात अडकला आहे.

Icon

पिढी गणिक जमिनीचे तुकडे होऊन, वैयक्तिक जमीन धारणा कमी झाली आहे.

Icon

संपूर्ण शेती ही पावसावर अवलंबून आहे. पावसाळी शेती झाली की केवळ मोल मजुरी हाच पर्याय त्यांना उरतो.

Icon

तुकड्यांची कोरडवाहू जमीन. त्यातून नियमित कमाई नसल्यामुळे मुलांची लग्ने होत नाहीत. शहरात चांगली कमाई होईल, नियमित पगार मिळेल या आशेने तरूण शहरात जातात आणि त्यांच्यासाठी वेटर, वॉचमन, बिगारी कामगार अशी कामं करणे हाच पर्याय असतो.

Icon

तरूण मूलं शहरात गेल्यावर शेती करायला गावात शिल्लक राहतात वयस्कर माणसं. शेतीची कामं करायला पुरेसं मनुष्यबळ नसल्यामुळे त्यांना शेवटी दूध विकणे, शेळ्या-कोंबड्या पाळणे असे करून उदरनिर्वाह करावा लागतो

सह्याद्री मधील निसर्ग संपदेचे वास्तव

सह्याद्रीतील वृक्षसंपदेचा दिवसेंदिवस ऱ्हास होत चालला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. उतारांवरून पावसाचे पाणी वेगाने वाहून जाते. त्यामुळे डोंगर उतारावरील मातीची धूप होते. ही वाहून आलेली माती धरणांमध्ये साठते, परिणामी नद्यांना पूर येणे, नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरून वाताहात होणे, दरड कोसळणे या गोष्टी साहजिकच होतात.

कालांतराने, पावसाचे प्रमाणही कमी होत आहे. जागतिक हवामान बदल व स्थानिक पर्यावरणाचा नाश यामुळे हजारो वर्षांपासूनचे शेतीचे अनुभवसिद्ध गणित कोलमडले आहे.

वन्य जीवांचा आसरा नष्ट होऊन ते शेतांवर हल्ला करतात. हिंस्र जंगली प्राण्यांचा वाढता वावर मानवी वस्त्यां मध्ये आढळून येतो.

सह्याद्री व त्यातील वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्थेला वाचवायचं असेल तर डोंगरांवरील जंगलांचा विध्वंस आणि अतिरिक्त मानवी हस्तक्षेप थांबवावा लागेल.

शहरांतील मृगजळ

आपली गावातील मुलं नियमित पगार मिळावा या आशेने व शहरी राहणीमानाच्या ओढीने शहरामध्ये येतात. त्यांचं गावाकडचं बेताचं शिक्षण झालेलं असतं.यामुळे चांगल्या नोकऱ्यांसाठी असलेल्या तीव्र स्पर्धेत त्यांचा टिकाव लागणे अवघड जातं. मग त्यांना मिळेल ते काम करावं लागतं. सिक्युरिटी गार्ड, वेटर, रिक्षा चालक अशी कामे करणे हाच पर्याय शिल्लक राहतो.


आता असे काम मिळाले, म्हणजे सर्व प्रश्न सुटले का? तसं अजिबात होत नाही. शहरात राहायच्या जागेच्या समस्या, काम कधीही जाऊ शकेल याची भीती, पगाराची शाश्वती नाही, आरोग्य विमा - पीएफ अशा सुविधा नाहीत. म्हणजेच, शहराकडे धावायच्या नादात, चांगल्या आयुष्यापासून आपण दूरच राहातो.


धूसर भविष्य

आपण सह्याद्रीचा असाच विनाश करत राहिलो तर सह्याद्रीत राहणाऱ्या कोट्यवधी लोकांचे भवितव्य धूसर आहे आणि आपणा सर्वांचे देखील.

Icon

सह्याद्रीरांगाच्या माथ्यावर, पूर्वेला व पश्चिमेला राहणाऱ्या स्थानिक लोकांना विस्थापित होऊन रोजगारासाठी भटकावे लागत आहे

Icon

शेतकऱ्यांना मोल मजुरीसाठी आपल्या जमिनी सोडून, वृद्ध आणि लहान मुलांना गावी सोडून, शहरातील झोपडपट्टीत, बकाल अवस्थेत राहत आहेत.

Icon

स्वतःच्या हातानेच आपण पुढच्या पिढीचा तोंडचा घास हिरावून घेत आहोत. आपल्या सर्वांचे (सरकारी संस्था, सामाजिक संस्था, शेतकरी, इतर जबाबदार नागरिक) एकत्रित प्रयत्नच परिवर्तन घडवू शकतील.

दुष्टचक्र

या दुर्दैवी परिस्थितीमुळे गावात, मागे केवळ वयस्कर कुटुंबं राहतात, ज्यांना दुधाच्या व्यवसायासारखे काही थोडेच पर्याय शिल्लक राहतात.

मग त्यासाठी डोंगरांवर मुक्त चराई करण्यात येते. तो चारा जोमाने यावा, म्हणून डोंगरावरील वाळलेल्या गवताला आग लावली जाते.

अशाने साहजिकच वनस्पतींचं आच्छादन नष्ट होतं, मातीची मोठी धूप होते व भूजल पातळी अजून खाली जाते.

याचा परिणाम म्हणजे अर्थातच, शेतीला पाणी कमी, उत्पन्न कमी, आणि शेवटी, नाईलाजाने युवक नोकरी साठी शहराकडे धाव घेतो. हे थांबवायला हवं!